सोलापुरात हजारों नयनांनी पाहिला हा भव्यदिव्य सोहळा ; लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात 40 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी
सोलापूर : रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना...लगीन घाई सुरु... 40 जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली... या जोडप्यांना कुठलाच धर्म नव्हता, आयुष्यभर साथ देण्यासाठी... त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या लोकमंगल फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात. याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही आले होते.
माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 27 नोव्हेंबर रोजी विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर हजारो मान्यवरांच्या उपस्थिती पार पडला. या विवाह सोहळ्यात 40 वधू-वरांनी रेशीमगाठी बांधल्या.
सकाळी सर्व वधू- वरांना आ. सुभाष देशमुख यांनी समुपदेशन केले. वधू- वरांना मान्यवरांच्या हस्ते शालू, सपारी व रुखवत साहित्य देण्यात आले. विवाह सोहळ्यामध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात आले होते. रक्तदान शिबिरही घेण्यात आले. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. मसाले भात, पोळी भाजी, भजी आणि मोतीचूर लाडू असा मेनू होता.
गेल्या दोन वर्षी कोरोनाकाळामुळे वधू-वरांची मिरवणूक काढली नव्हता. यंदा कोरोना संपल्यामुळे वधू-वरांची रिक्षातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
यंदाच्याही या सोहळ्यात आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले.
सायंकाळी गोरस मुहूर्तावर सुरवातीला बौद्ध पद्धतीने विवाह लावण्यात आला. त्यानंतर हिंदू रितीप्रमाणे उर्वरित विवाह पार पडले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, रेणुक शिवाचार्य महाराज, पंचाक्षरी महास्वामी, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, मनीष देशमुख, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, बसवराज शात्री, ह. भ. प. शिवपुत्र स्वामी महाराज, ह. भ. प. ज्योतिराव चांगभले महाराज, ह. भ. प. विष्णुपंत मोरे महाराज, ह. भ. प. रमेश महाराज शिवपूरकर, ह. भ. प. बळीराम जांभळे महाराज, ह. भ. प. संजय केसरे, महाराज, ह. भ. प. अभिमन्यू डोंगरे महाराज, नरेंद्र काळे , अमर बिराजदार , गणेश चिवटे, सोमनाथ केंगनाळकर, सभापती गुरुसिद्ध मेह्त्रे, डॉ. चनगोंडा हवीनाळे, शशी थोरात, महेश देवकर, श्रीनिवास करली , भाजपचे दक्षिण तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सचिन चव्हाण, मनिषा हुचे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करू : आ. देशमुख
आपण या समाजात जन्मलो आह. त्यामुळे समाजाचे ऋणी लागतो म्हणून लोकमंगल परिवार जनतेबरोबर आहे. लोकमंगलच्या या प्रयत्नाला सर्वांनी साथ द्यावी. सर्वांची साथ मिळाल्यास शेवटच्या माणसाचेही अश्रू पुसण्याचे काम आपण करू त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक होईल, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी विवाह सोहळ्याप्रसंगी केले.
Comments
Post a Comment